कालाय तस्मै नमः??

5
0

-१--

वितोरिओ आज काहिसा आनंदी, काहिसा काळजीत होता.. त्यांच्या भागात समुद्रातून काहि पाहुणे आले होते. काहिंच्या मते ते देवदूत होते तर काहिंच्या मते ते समुद्रातच रहाणारे आपल्यासारखेच लोक होते... त्यांनी गेल्या महिनाभरात कोणालाहि न विचारता किनार्‍यापासून जवळ असणार्‍या एका मैदानात तंबु उभारले होते... काहि दिवस गेले.. चंद्र पुन्हा एकदा पूर्ण दिसू लागला होता.. मग मात्र वितोरिओने ठरवले की त्यांना विचारचे की तुमचा कार्यक्रम काय आहे? इथे किती दिवस आहात?
वितोरियो हा निसर्गपुत्र होता. मातीशी मिळत्याजुळत्या रंगाचा, अंगावर समुद्राने दिलेले शिंपले लावलेला, डोक्यावर आवडत्या पक्ष्यांची पिसे लावणारा वितोरिओ. किनार्‍यापासून थोड्या दुर अंतरावरच्या एका गुहेत तो रहायचा. जंगलांतील पक्षी, प्राणी त्याचे मित्र होते. नवीन आलेले पाहुणे मात्र परग्रहावरील असल्यासारखे वाटत होते. ते पांढरे पडले होते. अंगावर कसल्याश्या कृत्रिम गोष्टीचा थर चढवायचे. निसर्गाने दिलेले शरीर ते का झाकतात हा प्रश्न वितोरिओच्या मनात कैकदा आला होता. ते पाहुणे कसलेसे तंबु का उभारतात आणि त्यात का रहातात हे त्याला अगम्य वाटत होते. इतक्या छान वातावरणात जंगलभर पळायचे, हिंस्त्र प्राण्यांची शुर शिकार करायची सोडून हे लोक एका नळकाड्यांतून तासन्तास काय बघतात हे त्याला कळत नसे. शिवाय ती मंडळी रोज रात्री आग लावत आणि त्याभोवती काहितरी पिऊन आरडाओरडा करीत असत. जमिनीवर बसायचे सोडून लाकडाच्या चौकटींवर बसत. एकूणच ती मंडळि कोण आहेत कुठून आली आहेत हे वितारीओला जाणून घ्यायचं होतं

आज सकाळीच तो उठला, नदीवर त्याने मस्त आंघोळ केली. आपल्या डोक्यावर काहि नवी पिसे बसवली. गळ्यात, कमरेला स्वच्छ केलेली शिंपल्यांची माळ बांधली आणि तो त्या तंबुवाल्या पाहुण्यांच्या टोळीकडे निघाला. तिथे जवळच एक तळं होते. तिथे एक स्त्री डुंबत होती. ह्याला मौज वाटली. कारण ती स्त्रीदेखील इतर स्त्रीयांप्रमाणेच होती. तिने शरीरांवरची आवरणे काढून ठेवली होती त्यामुळे रंग सोडल्यास हे पाहुणे आपल्यासारखेच आहेत असे वितारिओला वाटले. जरी ते मुर्खासारखे आवरणे घालत असले, तंबुत रहात असले, चौकटींवर बसत असले तरी आपण त्यांना सुधारू शकु असे वितारीओला वाटले. तो त्या डुंबणार्‍या स्त्रीकडे बघतच राहिला. काहि वेळात त्या स्त्रीचे लक्ष झाडात मिसळलेल्या वितारिओकडे गेले आणि ती दोन मिनीटे त्याच्याकडे बघतच राहिली आणि मग दोन मिनीटात जोरात आवाज काढू लागली

तिचा आवाज काढण्याचं कारण वितारिओला कळेना. काहि वेळातच दोन आवरणे घातलेले पुरुष आले आणि तेही वितारिओकडे भयचकीत नजरेने पाहु लागले. वितारीओ ने त्यांना काहि सांगण्याचा प्रयत्न करण्याच्या आतच त्यातल्या एकाने एक नळकांडे त्याच्याकडे रोखले, त्याला एक आवाज ऐकु आला आणि छातीत काहितरी गरम झाल्यासारखं वाटलं. बघितलं तर छातीतून रक्त येत होतं.. त्याला काहि कळण्याच्या आत त्याचा अंत झाला होता.

पुढे काही काळातच स्पष्ट झालं होतं की हा अंत वितारीओचा नव्हता तर काहि शतके अमेरिकेच्या विस्तीर्ण भुमीवर अभिराज्य गाजवणार्‍या मुळ स्थानिकांच्या संस्कृतीच्या र्‍हासाची ती सुरवात होती.

--२--

सन १९४९, नोर्बुच्या कानावर शेजारील भारताच्या स्वातंत्र्याच्या कथा येत होत्या. भारताला स्वातंत्र्यात बघुन तो आनंदात होता. हिलामयातील एका मॉनेस्ट्रीमधील मोकळ्यावर असणार्‍या एका कोपर्‍यातील आसनावर तो बसून ध्यान लावायला बसणार होता इतक्यात एक लहान शिष्य धावत त्याच्याकडे आला आणि त्याला बातमी दिली
"चायनाने हल्ला केला आहे!!!!!"
नोर्बु क्षणात चिंताक्रांत झाला.. धावतच आपल्या गुरूंकडे गेला.. गुरू सामान बांधत होते..
"काय झालं? कुठे निघालात"
"आपल्याला राजकीय भांडणात पडायचे नाहि.. आपली संस्कृती टिकणे फार महत्त्वाचे आहे"
"अहो पण मग आपला देश?, आपली जमिन?"
"ती आपल्याला मिळेल न मिळेल नाहित नाहि.. पण आपण इथे थांबून लढलो तर त्यांच्यात नी आपल्यात फरक काय? ते येणार ते जिंकणार हे निश्चित आहे. नंतर आपली संस्कृती पूर्ण लोप पावण्याच्या आत आपल्याला पलायन करणे भाग आहे.. निदान संस्कृती टिकवण्यासाठी.. आवाज टिकवण्यासाठी"
"भारताकडूल लढाईत मदत नाही मिळाली..?"
त्याचे गुरू नुसतेच हसले. आणि भारतात पलायन करण्यासाठी निघाले...

--३--

रामलालच्या मनात चिंतेने घर केले होते..
कालच रामलाल - घामाने डबडबलेला जाडासा माणूस - त्यांच्या वस्तीवर येऊन गेला होता. मुळ रस्त्यापर्यंत जरी तो गाडीतून आला होता तरी त्यांच्या वस्तीपर्यंत यायला तासभर जंगलातून चालणे क्रमप्राप्त होते. तो आला.. सरळ मुखियाकडे गेला..
"राम राम"
"राम राम"
"मी रामलाल, शासकीय अधिकारी, गुजरात सरकार"
"बसा"
"ही नोटीस"
त्या घामट गाठोड्याने एक कागद पुढे केला
"म्हंजे?"
"म्हंजे ६ महिन्यांत तुम्हाला वस्ती रिकामी करायची आहे"
"आणि मग जायचं कुठे?"
"ही जागा धरणाच्या पाण्याखाली जाणार आहे.. तुम्हाला दुसर्‍या जागेत हलवणार"
"कुठे?"
तो अधिकारी एका गावाचं नाव सांगतो. मुखिया हताशपणे बोलतो...
"पण ते गाव आहे, आम्ही जंगलात रहातो, नर्मदामैया आम्हाला इथे पोटापुरतं देते.. आम्हाला जंगलाबाहेर रहाताच येणार नाहि.. आम्हाला शहरी रिवाज माहित नाहितच, पण त्याहून मुख्य जंगल आमचं सर्वस्व आहे. आम्ही इथे वेगळी भाषा बोलतो, वेगळं अन्न खातो, वेगळे कपडे, वेगळे सण, वेगळी रहाणी आहे.. ते सगळं सोडून द्यायचं???"
अधिकार्‍याला काय बोलावं समजत नाहि.. आपण जगातली अजून एक संस्कृती मिटवत आहोत असा विचार त्याच्या मनात चमकतो

{विस्थापन}

विस्थापनाच्या इतिहासाची ललित अंगाने जाणारी कहाणी म्हणूया का याला?

{असेच म्हणावे वाटत}

असेच म्हणावे वाटत


-निखिल

{ह्म्म}

आहे खरे! असाही उत्क्रांतीवाद!

{माणसाचा इतिहास हा स्थलांतराचा}

माणसाचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास आहे.

कधी स्वतःहुन कधी निसर्गाकडून तर कधी .... असो.

{नानाशी सहमत !}

नानाशी सहमत !


"इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! "

"ऐसी अक्षरे मेळविन !"

{ह्म्म.. कालाय तस्मै}

ह्म्म.. कालाय तस्मै नमः.. बाकी, नानाशीही काही अंशी सहमत आहेच

{छान}

उत्तम. 'सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट' ते 'सर्व्हायवल ऑफ द मायटीएस्ट' ची उत्क्रांती म्हणावी का ही?

{असंच काहीसं वाटलं!}

असंच काहीसं वाटलं!

{नंदन शी सहमत}

apocalypto आठवला.

{असचं वाटलं}

असचं वाटलं .... बाकी नानाशीही सहमत ..

{नानाशी सहमत...}

नानाशी सहमत...


Hope is a good thing...

{मस्त लेखन.....}

बर्‍याचदा विकास असाच होतो. स्थलांतर आणि असमतोल विकास या एकाच नाण्याच्या दोन्ही बाजु आहेत हेच खरं.


---
प्रसन्न केसकर
(पुर्वाश्रमीचा पुणेरी)

{प्रश्न अवघड पण उत्तर}

प्रश्न अवघड पण उत्तर त्याहुनही अवघड!


-Nile

{तुट्क तुटक}

तुट्क तुटक चित्रांतून समर्थ संदेश...

{मस्त!}

वर काढल्याबद्दल मनोबाला धन्यवाद!

संस्कृतींचे आक्रमण आणि आक्रमणाची विकृती मस्त मांडली आहे.

{संस्कृतींचे आक्रमण आणि}

संस्कृतींचे आक्रमण आणि आक्रमणाची विकृती मस्त मांडली आहे.

वाचल्यावर असेच म्हणावे असे वाटत आहे.
एका संस्कृतीने दुसर्‍या संस्कृतीवर केलेले हल्ले. ज्याच्याकडे बळ होते तो कान पिळत राहीला, एवढेच सत्य.

{सगळे वाचल्यावर, हे आठवलं व मन}

सगळे वाचल्यावर, हे आठवलं व मन सुन्न झालं.

तुमच्या बागा फुलाव्यात, ऊसमळे झुलावेत
साखर कारखाने निघावेत, यंत्र चालावीत,
तुमच्या घराघरात वीज खेळावी, म्हणून
आम्ही आमची गावं आणि आमचं
भवितव्य धरणाच्या घशात कोंबलं.
विकासाचा नारळ फोडण्यासाठी दगड
म्हणून आमची डोकी वापरलीत. खोबरं
तुम्हाला मिळालं आणि आम्ही पाण्यासाठी
साध्या स्मशानासाठी भिका मागायच्या,
जिवंतपणी आणि मेल्यावरही झडती चालूच..

झाडाझडती ( विश्वास पाटील)

{आभार}

हा धागा मीही विसरलो होतो. तो वर आणल्याबद्दल अनेक आभार मनोबा.
आता धागा वर आलाच आहे तर गेल्यावेळी राहिलेले सगळ्यांचे प्रोत्साहनाबद्दल-प्रतिक्रीयांबद्दल आभारही मानतो. हास्य


-ऋ

{विकासाची किती किंमत कुणी}

विकासाची किती किंमत कुणी कुणी मोजली आहे काळाच्या प्रवाहात हे कधीच कळणार नाही आपल्याला.

{कालय तस्मै नमः? खरं आहे,}

कालय तस्मै नमः?
खरं आहे, एकाचा विकास हा एकचा विनाश होऊ शकतो.


करतो. करेन. व करेगें

{सत्तांतर म्हणावे का याला??}

सत्तांतर म्हणावे का याला??

{संस्कृतींचे आक्रमण फार छान}

संस्कृतींचे आक्रमण फार छान मांडलं आहे!

{छे हे कसे वाचायचे}

छे हे कसे वाचायचे राह्यले?
सुंदर लिहीले आहे
पण्,चांगल्या अथवा वाईट, कोणत्याही संस्कृतीचा र्‍हास हा अटळच असतो.जेवढ्या आपल्या संवेदना बोथट, तेवढे जगणे सोपे!
मी जगणे सोपे असावे अश्या मताचा आहे.


..............................................................

क्या फर्क पडता है?