गहिरे पाणी

रहस्यमयता – नाट्यात्मता हे, रत्नाकर मतकरींच्या आत्मविष्काराचे स्वाभाविक माध्यम आहे. वाचकांना गुंतवून ठेवणार्‍या त्यांच्या अतिमानुषाच्या कथाही अखेर मानवी प्रश्र्नांशीच संबंधीत असल्याने त्या वास्तव, खर्‍याखुर्‍या वाटतात. या कथांतून गूढाचा व भयाचा विविध पातळ्यांवर, विविध स्वरूपात, विविध माध्यमांतून प्रत्यय येतो. स्वतःला जाणवलेले अर्थपूर्ण जीवनानुभव व्यक्त करण्यासाठी मतकरी गूढकथेतील विविध शक्यता शोधत असतात. आणि त्यांतून त्यांच्या कथांतील रचनाबंधांचे आणि निवेदनशैलीचे वैचित्र्य उद्भवते.
रंगमंचावर अनेक वेळा सादर झालेल्या या कथांचे वैशिष्ट्य म्हणजे दूरचित्रवाणीवरही त्या तितक्याच प्रभावी आणि परिणामकारक ठरत आहेत. मतकरींच्या या गूढकथा गेले वर्षभर अल्फा झी मराठी वाहिनीवर दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता `गहिरे पाणी’या अत्यंत यशस्वी मालिकेच्या रुपाने रसिकांसमोर येत आहेत.
त्यांच्या `महाद्वार’ या संस्थेने निर्माण केलेल्या, आणि त्यांनी स्वतःच दिग्दर्शित केलेल्या या मालिकेचे पहिले 50 भाग ज्यांच्यावर आधारलेले आहेत. त्या कथा इथे प्रथमच एकत्रित केल्या आहेत...