सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र ह्या प्रत्येक वेळेचा एक वेगळा सुर असतो... डोंगर-द्ऱ्यां मधून भटकताना हा सुर अगदी सहज जाणवतो... एकांत, शांतता, रातवा, घुबड, दरी मधून वाहणारा वारा ह्यांच्या स्वरांनी रात्रीचा सुर सजलेला असतो... रात्रीच जग जसं आपल्याला गुढ वाटतं अगदी तसाच रात्रीचा सुर देखील फार गुढ असतो... पण ही गुढता अनुभवण्यात वेगळाच रोमांच आहे...
मध्यरात्र उलटून गेली होती आणि आम्ही चौघे राजमाचीच्या दिशेने चालत होतो... मंद चंद्रप्रकाशात रात्रीच जग वेगळच भासत होतं... मेघा-हायवे मागे टाकला आणि लहानसा चढ चढून आम्ही तुंगार्ली तलावाजवळ पोहचलो... रात्रीच्या उजेडात तळ्यातलं पाणी मस्त चमकत होतं... गार वाऱ्यामुळे घामेजलेलं शरीर फार सुखावलं... ठाकरवाडी मागे टाकून उतरायला सुरुवात केली... दूरवर दरीच्या पल्याड श्रीवर्धन आणि मनरंजन चांदण्या मोजण्यात दंग होते... दुपारच्या उन्हात भाजून निघालेली माती रात्रीच्या गारव्याने तृप्त आणि सुगंधीत झाली होती... मातीचा ओला सुगंध, गार वारा, एकांत आणि शितल चंद्रप्रकाश अशा मंतरलेल्या वातावरणात आम्ही भटकत होतो...

दरीच्या अगदी टोकावर थोडावेळ विसावलो... दरीचा तळ दिसत नव्हता, पण खोली मात्र जाणवत होती... वाऱ्याचा स्वर दरीत घुमत होता... डोकं, मन आणि शरीर सगळच फार हलकं झालं होतं... जणूकाही दरीतल्या वाऱ्याशी एकरुप झालं होतं... कसल्याच यंत्राचा आवाज नाही... माणसांचा गोंगाट नाही... केवळ रात्रीची शातंता होती... मधूनच एखादा रातवा, घुबड खालच्या जंगलातून साद घालत होता... भान हरपून बराच वेळ हे सगळं अनुभवलं... मग घोट-घोटभर पाणी प्यायलो आणि पुन्हा वाटचाल सुरु केली... आता दाट झाडीतून पुढे सरकत होतो... झाडीत हालचाल जाणवायची, पण दृष्टीस काही पडत नव्हतं... साधारण पहाटेचे ४.३० वाजले होते... चंद्र आता जरा तांबूस-पिवळा भासत होता... पहाट होत होती मात्र काळोख वाढत होता... हळूहळू चंद्र राजमाचीच्या मागे अस्त पावला आणि सारं नभांगण नक्षत्रांनी, तारकांनी भरुन आलं... पहाटेच्या ऐवजी रात्र झाल्या सारखं भासू लागलं... आयुष्यात पहिल्यांदाच चंद्रास्त अनुभवला आणि तो देखील जंगलात, राजमाचीच्या सहवासात...
श्रीवर्धनाच्या माथ्यावरुन सुर्योदय बघायचाय म्हणून आम्ही झपाझप चालायला सुरुवात केली आणि साधारण ६ वाजता माथ्यावर पोहचलो... गार वाऱ्यात सभोवताल न्याहाळला... सारं जग शांत झोपी गेलं होतं... थोड्याच वेळात उगवतीचं आकाश जरा तांबूस वाटू लागलं... आणि हळूहळू शिरोटा तलावातून सुर्यबिंब वर आलं... सारा आसमंत सोनेरी प्रकाशात न्हावून निघाला... आळस झटकून मांजरसुंबा, ढाक जागे झाले आणि राजमाचीला साद घालू लागले... भवतालच्या जंगलातून पक्ष्यांची चिवचिवाट सुरु झाली... साऱ्या सृष्टीत चैतन्य पसरलं...


(मांजरसुंबा डोंगर आणि मागचा ढाक)

नारायणाला वंदन करुन उधेवाडीकडे निघालो... गावात एका घरात सामान ठेवलं आणि गावामागच्या तळ्याकाठी पोहचलो... तळ्याच्या गार पाण्यात मस्त पोहलो, ताजेतवाणे झालो आणि शंकराच दर्शन घेतलं...

पुन्हा गावात आलो... मस्त जेवलो... पोट भरल्यावर गुंगी आली आणि घराच्या अंगणात आडवे झालो... जाग आली तेव्हा दुपारचा १ वाजला होता...
(ह्यानं उठवलं वेळेत...)

चहा घेतला आणि लगेचच कर्जतच्या वाटेला लागलो...
(राजमाचीहून दिसणारं तळकोकण)

भर दुपारच्या उन्हात चालायला मजा येत होती... काटेसावर फुलून गेली होती, पण तिचा कापूस मात्र सगळीकडे पसरला होता... पांगारा, टबुबीआ अजून बहरलेले होते...
(पांगारा)

(टबुबीआ)

(ओळखता नाही आलं... रेन ट्रीचं फुल आहे का हे?)

इतकी नाजूक फुलं रणरणत्या उन्हात सुध्दा किती सुंदर दिसतात!...
कर्जतच्या बाजूला उतरताना वाटेत बरेच घोस्ट ट्री आहेत... रात्री चंद्राच्या प्रकाशात हे झाड चकाकत असतं म्हणून ह्याला घोस्ट ट्री म्हणतात...
(घोस्ट ट्री... मराठीत बहूतेक तरी ह्याला ‘सालदोड’ म्हणतात)

साधारण ३ तासात तळात पोहचलो... मग टमटमने कर्जतला... कर्जतहून पुण्यासाठी रेल्वे... लोणावळ्याकडे जाताना रेल्वेतून पुन्हा राजमाची आणि संपुर्ण डोंगररांग न्याहाळली... कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...
विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/
अहाहा..
कितीही वेळ डोंगराच्या कुशीत घालवला तरी मनाचं काही समाधान होत नाही... आता परत कधी येणार अशीच हुरहुर असते...
अगदी खरं... लेख आणि चित्रे आवडली हेवेसांनल.
स्वाती
+१
सहमत आहे.
उगवत्या सूर्याचं चित्र क्लासच!
(आजच म्हणत होतो, बरेच दिवस विमुक्ताचा भटकंतीवरचा लेख आला नाही. नेमकी इच्छा पूर्ण झाली
)
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वरुन सहाव्या फोटूत जेवण दिसले
वरुन सहाव्या फोटूत जेवण दिसले
हॅ हॅ हॅ
फारच मनावर घेतलं जनू.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सही
बरेच दिवसानी दर्शन दिलेत विमुक्तराव!
ही सहल देखील मस्तच!
झकास
विमुक्तराव. राजमाची हा आमचा वीक्-पॉईंट. जन्ता कोणत्याही विकांताला उठायची नि चालू लागायची. रात्री चालत माचीवरचे देऊळ गाठायचे नी त्यासमोरील पठारावर खुल्या आकाशाखाली मस्त ताणून द्यायची. गेले ते दिन गेले.
आभार.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
सह्ही!
सह्ही!
वा !
वा !
नेहमीप्रमाणे मस्त.
नेहमीप्रमाणे मस्त.
भन्नाट!!! फुले सुतेख
भन्नाट!!!
फुले सुतेख आहेत.
घड्याळाचा फोटु लै गोंडस.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
त्याचे पुढे काय झाले?....
विमुक्त भौ,
राजमाची ची भटकंती मस्तच.फोटोही झकास आले आहेत. वर्णन तर असे वाटले की तुमच्या बरोबरच फिरतो आहे. बाय द वे ज्याने तुम्हाला वेळेवर उठवले त्याचे पुढे काय झाले? तो आहे ना? की.....
मस्त लिहिल आहेस. फोटोदेखील
मस्त लिहिल आहेस.
फोटोदेखील भारी आहेत.
ते रेनट्रीच फुल नाहीये. रेन ट्री गुलाबी झुपक्याच असतं.
रेन ट्री
म्हणजे आपला 'शिरीष' ना?
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
हा मला माहीत असलेला रेन-ट्री
हा मला माहीत असलेला रेन-ट्री किंवा पर्जन्यवृक्ष
झकास
झकासराव मस्त फटू. माझा अंदाज बरोबर ठरला. हा शिरीषाच्या कुळातला आहे पण शिरीष नाही. शिरीषाची फुले एखाद्या कारंज्यासारखी दिसतात, हि फुलेही जवळजवळ तशीच आहेत.
__________________________________________
रमतारामाचे विश्रांतीस्थळ
पांगार्याच्या नावाचा उल्लेख
पांगार्याच्या नावाचा उल्लेख पण किती वर्षांनी ऐकला.
लहान असताना गावाला पांगार्याच्या लाकडाची बॅट बनवायचो आम्ही.
एकदम एहल फुलक लाकुड. रबरच्या चेंडुबरोबर चालुन जायची.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
मोळी
पांगार्याच्या लाकडाची मोळी कमरेला बांधायचो. शेतातल्या मोठ्या टाकीत विंजिनच पाणी पडायचे त्यातुन ते छोट्या टाकीत पडायचे. मोठ्या टाकीत पोहताना पांगार्याच्या मोळी बांधुनच उतरायचे.
पांगार्याच्या शेंगाचे बी कपड्यावर घासुन इतरांना चटके द्यायचो.
रम्य ते बालपण
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
>>पांगार्याच्या शेंगाचे बी
>>पांगार्याच्या शेंगाचे बी कपड्यावर घासुन इतरांना चटके द्यायचो.
पकाकाका हे विसलोच होतो.
(फक्त ते कपड्यावर न घासता लादीवर घासायचो. जल्ला कसला शॉट लागायचा.)
बर्याच मावश्यांचा हातचा मार खाल्लाय या पायी.
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
माझी खादाडी
खा रे खा
+ १ म्या बी मावशीचाच मार
+ १
म्या बी मावशीचाच मार खल्ला आहे...
गणपा...................................... तु कुठल्यातरी मेले में... हरवला नव्हतास ना रे
"Let me tell you something my friend. Hope is a dangerous thing. Hope can drive a man insane."
विमुक्त, खूपच छान वर्णन
विमुक्त,
खूपच छान वर्णन केलंय! फोटोही क्लासच आलेत!
आमच्या राजमचीच्या ट्रेक ची आठवण झाली . आम्हीही ती ट्रिप रात्रीच केली होती. त्यावेळी रस्ताही नीटसा माहीत नव्हता. फक्त एवढंच सांगण्यात आलं होतं की डावी बाजू ठेवा , उजवीकडे वळलात की ढाक ला पोहोचाल . चुकून आधीच्याच वळणाला डावी कडे वळालो आणि पोहोचलो खंडाळ्याला. तिथे पोहोचल्यावर एका गावातल्या माणसाने (एका ख्रिश्चन अंकल ने ) सांगितले तुम्ही रस्ता चुकलात म्हणून. पहाटेचे १-२ वाजले असतील तेव्हा. २५ डिसेंबरची रात्र होती ती. अंकल एकदम "सातवे आसमान पर" ;-). त्याच्यावर विश्वास ठेवावा की नको याबाबत ही गोंधळ. शेवटी ठरवलं आणि आलो (दीड दोन तास मागे) परत . पहाटे ५:३० राजमाचीला पोहोचलो. रात्रीचे बेभान वातावरण,रस्त्याची चुकामुक आणि यामुळे ट्रेक अविस्मरणीय झाला. पहाटेच्या गावातल्या चहाची चव अजून लक्षात आहे.
__________________________________________________________________________________________
देवो दुर्बल घातक:
मस्त लिहीतोस तू आणि फोटोही
मस्त लिहीतोस तू आणि फोटोही झकास!
(विषय दिलेला नाही)
कितीही
असंच कितीही वेळा तुझी भटकंती बघीतली तरी मनाचं समाधान होत नाही.. पुढच्या भटकतींचा धागा कधी येणार ह्याची हुरहुर असते. सुर्याचे आणि फुलाचे फोटु खास आवडले.
मस्त रे...साला लै दिवस झाले
मस्त रे...साला लै दिवस झाले रे राजमाची ला जाऊन.....
छान
.
छान लेख
लेख आणि फोटो मस्त आहेत. राजमाचीच्या आठवणी जाग्या झाल्या. रात्री तिथून निरभ्र आकाशातील चांदण्या पाहण्यची मजा काही औरच आहे
जिवनगाणे गातच जावे, झाले गेले विसरुन जावे पुढे पुढे चालावे
मस्त मस्त मस्त
मस्त मस्त मस्त